मनामनांत झालेले भेद दूर करण्याचे काम सामाजिक समरसता -- किशोर चव्हाण

 


पुणे (दिनांक : ०९ जानेवारी २०२५)

"मनामनांत झालेले भेद दूर करण्याचे काम सामाजिक समरसता” असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांनी सामाजिक समरसता अभियान यात्रेच्या माध्यमातून केले, आपल्या समाजाच्या दृष्टीने सामाजिक समरसतेचा विषय हा महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा आहे ,समाजात समरसेतेचा विचार रुजावा समरसतेचा भाव यावा यासाठी विश्व हिंदू परिषद नेहमीच  आग्रही व प्रयत्नशील  आहे . 

समरसतेच्या कार्यात मानसिक परिवर्तन व्हावे यासाठी वैचारिक प्रबोधन सेवा, समन्वय व आवश्यक त्या ठिकाणी संघर्षाचा मार्ग असे या कार्याचे स्वरूप आहे .आज  समरसता यात्रा आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पवित्र  स्मारकापासून प्रारंभ होत आहे,त्यांनी गंजपेठेतील तालमीच्या माध्यमातून चापेकर बंधू, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके ,महात्मा फुले असे अनेक क्रांतिकारक अन् नेते यांना प्रशिक्षण देऊन घडविले. क्रांतिगुरू लहुजी साळवे यांनी समाजासाठी आपले आयुष्य समर्पित केले.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी सामाजिक ऐक्यासाठी जीवन समर्पित केले. सुमारे दोनशे मंदिरांची उभारणी करणारे अशोकजी सिंघल यांचेही हिंदुधर्मासाठी महत्त्वाचे योगदान आहे . आज आपले अनुसूचित जाती व जनजाती बंधू वीर, बलिदानी, क्षत्रिय आहेत त्यांनी जंगलात राहणे पसंत केले स्वच्छतेचे काम करणे पसंत केले परंतु आपला धर्म सोडला नाही !सर्वजण स्वातंत्र्य सेनानी व धर्म योद्धे आहेत, त्यांचा गौरव करणे सन्मान करणे व बरोबरीचे स्थान देण्याची जबाबदारी हिंदू समाजावर आहे,असे पू अशोकजींचे मत होते.'अस्पृश्यता हा देशाला लागलेला कलंक आहे' अशी बाळासाहेब देवरस यांची भूमिका होती!"

आपल्या देशातील अनेक थोर पुरुषांनी समरस व  बलशाली समाजाचे स्वप्न पाहिले होते! त्यांच्या कार्याचे आणि विचारांचे आचरण आपण करूयात! आणि हा संदेश समरसता यात्रा आज देत आहे.

आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक, संगमवाडी, पुणे येथे गुरुवार, दिनांक ०९ जानेवारी २०२५ रोजी केले. विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित पुणे  परिसरातील तीन दिवसीय सामाजिक समरसता अभियान यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी किशोर चव्हाण व ॲड. सतिश गोरडे बोलत होते. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे वंशज केतन साळवे यांच्या हस्ते यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सामाजिक समरसता प्रमुख निखिल कुलकर्णी, राहुल विभूते, धनंजय गायकवाड, विजय कांबळे, हरीश वाल्मीकी, प्रथमेश परासर, अविनाश तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

ॲड. सतिश गोरडे म्हणाले की,  वैदिक हिंदूधर्मात अस्पृश्यतेला स्थान नाही, हिंदू धर्मात कधीही उच-नीच प्रमाण सापडत नाही. हिंदू तत्त्वज्ञान हे जगात श्रेष्ठ आहे; परंतु मोगल आणि नंतर ब्रिटिशांनी देशात जाणीवपूर्वक जातिभेद अन् अस्पृश्यतेची भावना पसरवली. त्यामुळेच नंतर हिंदुधर्मात तत्त्वज्ञान आणि व्यवहार यांत भूल होत गेली.

अस्पृश्यता आणि उच्चनीचतेचा भाव हा विचारातून आणि व्यवहारातून देखील संपला पाहिजे. आपल्या राष्ट्रातील संतांनी हिंदूंना परस्परांचे बंधू म्हटले आहे आणि म्हणूनच विश्व हिंदू परिषद, "हिन्दव: सोदरा: सर्वे, न हिन्दू पतितो भवेत्" अर्थात सर्व हिंदू ही एकाच मातेची लेकरे असून, कोणताही हिंदू आता पतित असणार नाही; हेच ब्रीद वाक्य घेऊन पुढे चालत आहे. 

समाजामध्ये जन-जागरण करून सामाजिक ऐक्याच्या माध्यमातून सनातन राष्ट्र, कन्या-भगिनी, मंदिर-संत यांची रक्षा करणे, सामाजिक व्यवहारातून अस्पृश्यता आणि उच्चनीचता संपवणे, याद्वारे समर्थ आणि समरस राष्ट्राची निर्मिती करणे हा उद्देश समोर ठेवून, विश्व हिंदू परिषद देशभरामध्ये समरसता यात्रेचे आयोजन करीत आहे. या यात्रेचे आणि अर्थातच समरस हिंदू समाज रचनेचे स्वागत करावे!" असे आवाहन त्यांनी केले.

निखिल कुलकर्णी यांनी प्रस्ताविक केले.  ॲड. संकेत राव यांनी सूत्रसंचालन केले. राहुल विभूते यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे चरित्र म्हणजे तत्त्वनिष्ठेचे मूर्तस्वरूप ! --- लताआशाताई कोल्हटकर

मातृशक्ती आणि दुर्गावाहिनीच्या वतीने महिलांचे मानवंदना पथसंचलन.

भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्य. --- श्री. बजरंगलाल बागडा (आंतरराष्ट्रीय महामंत्री वि हीं प )